राज्यात उद्यापासून एसटी 'लालपरी' धावणार! आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी : परिवहन मंत्री अनिल परब August 19, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख राज्यात उद्यापासून एसटी 'लालपरी' धावणार! आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी : परिवहन मंत्री अनिल परब राज्यात उद्यापासून एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. गणेश उत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई : राज्यात उद्यापासून सर्वसामान्यांच्या एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. परंतु, आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र, खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे. 19 ऑगस्ट 2020 | बुधवार राज्यात आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटीने प्रवास करता येणार! कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी एसटी सेवा ठप्प झाली. मुंबई विभागात अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी आजही एसटी धावत होती. राज्यातील इतर विभागात देखील एसटीची तुरळक सेवा सुरु होती. कोरोनाच्या या महामारीत एसटी लॉकडाऊनमुळे आपल्या गावाकडे जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांसाठी महाराष्ट्राच्या शेवटच्या सीमेपर्यंत धावली. इतकंच नाही तर राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एसटी थेट कोट्यापर्यंत पोहचली. तिथून महाराष्टाच्या कानाकोपऱ्यापर्यंत धावली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, लॉकडाऊनमुळे 113 दिवसाच्या कालावधीत एसटीच्या इतिहासात प्रथमच 2300 कोटींचा महसूल बुडाला. याआधी परिवहन विभागाने मे महिन्यात आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु "लोकांच्या मनात जबरदस्त भीती आहे. रेड झोनमधून इतर जिल्ह्यामध्ये माणसं पाठवू नका, कोरोना पसरवू नका, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. काही लोकांनी विरोध केला, त्यामुळे आम्ही ताबडतोब आंतरजिल्हा एसटीचा निर्णय स्थगित केला," असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं. तसंच आंतरजिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सेवा सुरु करण्याचा विचार असल्याचंही ते म्हणाले होते.